Friday, October 2, 2009

निलेश मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

गर्द केशरांची फ़ुले आणि सनईचे सूर
सारे असती भोवताली तरी मनात काहूर ॥

स्वप्नात माझिया फ़ुलती दोन केशरांचे दिवे
नव्या वयाचे गुज, रोमरोमी गंध नवे ॥

दिल्या सोडून पाण्यात मी बालपणीच्या होड्या
उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ॥

नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट
त्याच्या माझ्या मनामधे अबोलसा अंतरपाट ॥


सध्या मराठी दूरदर्शन जगतात चालु असलेल्या मालिकांच्या पुरामधे ’अंतरपाट’ ही अजुन एक नुकतीच सुरू झालेली मालिका. आणि इतर मालिकांप्रमाणेच हिला सुद्धा एक अद्वीत,अतुल्य शीर्षक गीत किंवा title song लाभलं आहे; किंबहुना हे म्हणीन की मालिकेचा विषय फ़ारसा नवीन नसला तरी शीर्षक गीत खुपच छान रचलं गेलंय. त्या गाण्यामधे एक वेगळेपणा आहे; freshness(हो, हाच शब्द योग्य आहे.. ताजेपणा वगैरे लिहिण्यापेक्षा)आहे. आता गाण्याचा मुळ बाज अर्थात लग्न, लग्नाळु मुलगी, लग्नाचं वातावरण याच्याशी मिळता जुळता आहे आणि असायलाच हवा, पण तरी निलेश मोहरीर ने ते इतक्या अप्रतीम प्रकारे रचलं आहे की तोडच नाही.
गाण्यातील काही जागा खरंच भाव खाऊन गेल्या आहेत. खास करुन ’माझिया’ मधलं ’या’ म्हणताना ’दिवे’ वरून ’नव्या’ वर येताना किंवा रोमरोमी मधला रोमी म्हणताना, ऐकताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या नंतर background वर येणारा गायकाचा आलाप तर गीताचं सौंदर्य द्विगुणीतच करतो. पुन्हा बेलाच्या आवाजातलं ’दिल्या सोडून पाण्यात’ ह्या शब्दांचे सूर तर कोणत्याही मुलीच्या किंवा व्यक्तीच्या ...असं म्हणणं जास्त योग्य ठरेल... ह्रदयाला हात घालतात. आणि ’उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ... नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट ’ हा patch तर हे गाणं अद्वीत होईल याची काळजी घेतो. आणि ’अंतरपाट’ हा शब्द शेवटी गायला जातो त्या क्षणी सुरावटींच्या सुखद सुंदर प्रवासानुभवातून जाऊन आपण मंत्रमुग्ध झालेलॊ असतो. फ़क्त एवढंच की गाणं डोक्यात register होण्यासाठी २-३ दा तरी ते लक्षपुर्वक ऎकायला हवं.
प्रत्येक मुलीमधे दडलेली निरागसता, मिश्किलपणा, फ़क्त स्वत:शी साधलेला संवाद, मनाशी असलेला प्रामाणिकपणा या सगळ्याची पुरेपूर आठवण हे गाणं ऎकताना होते.. निदान मला तरी झाली.

निलेश मोहरीर ने या आधी ’कळत नकळत’ आणि ’कुलवधु’ या मालिकांची शीर्षक गीतं रचली आहेत.’कळत नकळत’ हे वैशाली सामंतने म्हटलं आहे आणि ’कुलवधु’ वैशाली माडेने गायले आहे. आणि आता हे ’अंतरपाट’ गायलंय बेला शेंडेने. ही तिन्ही गाणी इतकी वेगळी,तोडीस तोड आणि गोड सुरावटींची आहेत... आणि या तिन्ही गायिकांनी देखील ह्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. निलेशने सुद्धा प्रत्येक गाणं वेगळ्या गायिकेला देऊन आपलं वेगळेपण जपलं आहे. म्हणुनच म्हटलं मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

-निलेश ची नवीन फ़ॅन
अदिती

No comments:

Post a Comment

Followers