Friday, October 16, 2009

उकडीचे मोदक - माझा पहिला वहिला प्रयोग


पुरणपोळी च्या यशस्वी प्रयोगानंतर असाच एखादा खास अस्सल मराठी पदार्थ करावा असं डोक्यात होतं. आणि अनायासे गणेशोत्सव चालू होताच. बॅंगलोर मधे गणेशोत्सव चालु आहे हे विशेष जाणवत नाही. आपलंच तारखेकडे लक्ष असेल तर .. २-३ दिवसांनंतर अनंतचतुर्दशी होती. चला! ठरलं. विसर्जनाच्या दिवशी मोदक तेही उकडीचे करायचे. पण पहिल्यांदाच करणार म्हणुन आधी सॅंपल म्हणुन करुन पहावे असं ठरवलं. पण रोजच्या ऑफ़ीसच्या रुटीन मधे सॅंपल बिंपल करणं बाजुला राहीलं आणि विसर्जनाचा दिवस येऊन ठेपला. माझा उकडीचे मोदक करण्याचा मानस खुपच पक्का होता, त्यामुळे प्रयोग तर प्रयोग अशी बिनधास्त (बिनधास्त कसलं..मनात एक मेजर टेन्शन होतंच, बिनधास्त म्हणायचं ते आपलं स्वत:लाच moral support द्यायला) भुमिका ठेवून मी गुळाचा डबा काढला. नारळ खवूनच ठेवलेला होता. पटाकन सारण करुन घेतलं. म्हणजे कमी टेन्शन असलेली कृती आधीच केली.

आता राहिलेला होता खरा challenging भाग. तांदुळाची पिठी घेतली आणि आईने सांगितल्या प्रमाणे उकड करायला सुरूवात केली.उकड शिजली.गॅस बंद केला पण तरी उकड खूप घट्ट वाटत होती. अजुन मऊसर हवी असं वाटत होतं. आईच्या सल्ल्याने पाणी टाकुन फ़ेरफ़ार बदल केले आणि पटापट मोदक करायला घेतले. पहिला मोदक अगदी सुरेख सुबक नसला तरी मोदक वाटावा इतपत आकार त्याचा नक्कीच आला होता. आपण खुष झालो एकदम आणि मग पटापट पुढचे मोदक करायला घेतले.

जसजसे पुढचे मोदक करायला लागले, तसतसे उकड गार होत असल्यामुळे मोदक वळवायला त्रास व्हायला लागला. एकीकडे ऑफ़ीसची वेळ होत होती. आपली धावपळ होत आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आलं होतं.
घरी कॅब घ्यायला येते पण मोदक प्रकरणामुळे cab काही आत नशीबात नसणारे असं वाटून मी एका cabmate ला कळवलं की आज मी कॅब ने नाही येणार. केलेल्या उकडीचे एकुण ९ मोदक केल्यानंतर शेवटी थांबले; सारण तसंच ठेवलं. मग मोदक उकडायला लावले. आणि ऑफ़ीस च्या तयारीला लागले. मोदक घेऊन निघाले तेव्हा लक्षात आलं.. नेहमी निघते त्या पेक्षा २० मि. उशीर झाला होता. बाहेर पडले रिक्षा शोधायला.. आणि काय वाटलं कोण जाणे मी cabmate ला फोन केला विचारायला की कॅब निघून गेली आहे का .. कधीतरी चुकून traffic मुळे cab ला उशीर होतो म्हणुन म्हटलं चान्स घ्यावा आणि काय news मिळावी मला !! cab अजुन माझ्या घरावरून पास झालीच नव्हती. मी लगेचच त्याला सांगितलं की मला घ्यायला या मग. अशा प्रकारे मोदक पण झाले आणि cab पण चुकली नाही. मी देवाची भक्त बिक्त असते तर मी म्हणाले असते की ’भगवान ने मेरी सुन ली’(tone जरा filmy style मधे) गणरायानेच कॅब उशीरा पाठवली कारण त्याच्या साठीच नैवेद्य करत होते ना.. :)

ऑफ़ीस मधे पोचल्यावर लगेचच माझ्या मराठी मित्र मंडळींना मी Pantry त बोलावलं. मोदक पाहुन सगळ्यांची कळी खुलली हे वेगळं सांगायलाच नको. तुपाची बाटली पण नेली होती मुददाम. गणपतीच्या काळात उकडीचे मोदक निदान एक एकच का होईना पण खायला मिळाला त्यामुळे जनता खुष झाली. आणि मी तर जाम खुष होतेच !

-अदिती

Friday, October 2, 2009

निलेश मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

गर्द केशरांची फ़ुले आणि सनईचे सूर
सारे असती भोवताली तरी मनात काहूर ॥

स्वप्नात माझिया फ़ुलती दोन केशरांचे दिवे
नव्या वयाचे गुज, रोमरोमी गंध नवे ॥

दिल्या सोडून पाण्यात मी बालपणीच्या होड्या
उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ॥

नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट
त्याच्या माझ्या मनामधे अबोलसा अंतरपाट ॥


सध्या मराठी दूरदर्शन जगतात चालु असलेल्या मालिकांच्या पुरामधे ’अंतरपाट’ ही अजुन एक नुकतीच सुरू झालेली मालिका. आणि इतर मालिकांप्रमाणेच हिला सुद्धा एक अद्वीत,अतुल्य शीर्षक गीत किंवा title song लाभलं आहे; किंबहुना हे म्हणीन की मालिकेचा विषय फ़ारसा नवीन नसला तरी शीर्षक गीत खुपच छान रचलं गेलंय. त्या गाण्यामधे एक वेगळेपणा आहे; freshness(हो, हाच शब्द योग्य आहे.. ताजेपणा वगैरे लिहिण्यापेक्षा)आहे. आता गाण्याचा मुळ बाज अर्थात लग्न, लग्नाळु मुलगी, लग्नाचं वातावरण याच्याशी मिळता जुळता आहे आणि असायलाच हवा, पण तरी निलेश मोहरीर ने ते इतक्या अप्रतीम प्रकारे रचलं आहे की तोडच नाही.
गाण्यातील काही जागा खरंच भाव खाऊन गेल्या आहेत. खास करुन ’माझिया’ मधलं ’या’ म्हणताना ’दिवे’ वरून ’नव्या’ वर येताना किंवा रोमरोमी मधला रोमी म्हणताना, ऐकताना मिळणारा आनंद शब्दातीत आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्या नंतर background वर येणारा गायकाचा आलाप तर गीताचं सौंदर्य द्विगुणीतच करतो. पुन्हा बेलाच्या आवाजातलं ’दिल्या सोडून पाण्यात’ ह्या शब्दांचे सूर तर कोणत्याही मुलीच्या किंवा व्यक्तीच्या ...असं म्हणणं जास्त योग्य ठरेल... ह्रदयाला हात घालतात. आणि ’उंच उंच तो पतंग भोळ्या भाबड्या त्या खोड्या ... नव्या दिशा जरतारी एक अनोळखी वाट ’ हा patch तर हे गाणं अद्वीत होईल याची काळजी घेतो. आणि ’अंतरपाट’ हा शब्द शेवटी गायला जातो त्या क्षणी सुरावटींच्या सुखद सुंदर प्रवासानुभवातून जाऊन आपण मंत्रमुग्ध झालेलॊ असतो. फ़क्त एवढंच की गाणं डोक्यात register होण्यासाठी २-३ दा तरी ते लक्षपुर्वक ऎकायला हवं.
प्रत्येक मुलीमधे दडलेली निरागसता, मिश्किलपणा, फ़क्त स्वत:शी साधलेला संवाद, मनाशी असलेला प्रामाणिकपणा या सगळ्याची पुरेपूर आठवण हे गाणं ऎकताना होते.. निदान मला तरी झाली.

निलेश मोहरीर ने या आधी ’कळत नकळत’ आणि ’कुलवधु’ या मालिकांची शीर्षक गीतं रचली आहेत.’कळत नकळत’ हे वैशाली सामंतने म्हटलं आहे आणि ’कुलवधु’ वैशाली माडेने गायले आहे. आणि आता हे ’अंतरपाट’ गायलंय बेला शेंडेने. ही तिन्ही गाणी इतकी वेगळी,तोडीस तोड आणि गोड सुरावटींची आहेत... आणि या तिन्ही गायिकांनी देखील ह्या गाण्यांना योग्य न्याय दिला आहे. निलेशने सुद्धा प्रत्येक गाणं वेगळ्या गायिकेला देऊन आपलं वेगळेपण जपलं आहे. म्हणुनच म्हटलं मोहरीर साहेब, मानलं बुवा आपल्याला !

-निलेश ची नवीन फ़ॅन
अदिती

Followers