Friday, October 11, 2013

लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...


लिफ्ट  मधे माणसं शिरतात तेव्हा...

लिफ्ट मधे माणसं शिरतात तेव्हा...ही माणसं म्हणजे ना... आई शप्पथ काय सांगू तुम्हाला कसला गोंधळ घालतात !! तसं आम्हाला लिफ्ट प्रकार वापरण्याचा योग येतच नाही म्हणा... भिंत आणि लिफ्ट मधली फट हीच आमची लिफ्ट. त्यातून झरकन धावत आम्ही मजले पार करतो रोज.. तुरुतुरु, दुडूदुडू अशी विशेषणं देखील आम्हाला याच माणसांनी दिलीयेत. असो. तर मुद्दा काय की परवा मला सोसायटी मीटिंग साठी वरच्या मजल्यावर श्री. सरडे यांच्याकडे जायचे होते.  सौ. पालकर, श्री. झुरळे आणि कधी नव्हे तो Miss चिचुंद्रे  सुद्धा येणार होत्या. आता असा Golden chance मी सोडणार होतो होय! फक्त मनात आलं आज जरा या माणसांची Lift वापरून बघू ४ मजले धावण्यापेक्षा. म्हणून लिफ्ट ची फट उघडण्याची वाट बघत बसलो. १०मिनिटातच फट उघडली. कोणी २-३ माणसे शिरली.  

 तसं मी पण चपळपणे झरकन आत शिरलो. २ सेकंद झाले नाही आणि जोरजोरात किंचाळण्याचा आवाज यायला लागला. मी पण बावचळून इकडे तिकडे बघायला लागलो तर १ मुलगी आणि २ काका, काकू होते. जोरजोरात ओरडणारी तीच मुलगी होती. आणि ते काका मजेशीर होते. मुलगी किंचाळतेय आणि ते मात्र हसत होते फिदिफिदी. पुढच्या १० सेकंदांत काय झाले कळले नाही, ती मुलगी उड्या मारायला लागली. आणि किंचाळणे चालूच. आणि काही केल्या मला कारणच कळत नव्हते. अचानक झाले काय हिला! हिच्या उडयांपायी मी घाबरलो, म्हटलं हिचा पाय माझ्या शेपटीवर जरी पला तर वाट लागायची म्हणून मी पण आपला उड्या मारायला लागलो. उड्या म्हणजे काय आपलं Favourite काम. झालं! ती मुलगी आणि मी एकमेकांना Competition देत उडया मारतोय. आता ती मुलगी भलतीच घाबरली. किंचाळणं अधिक कर्कश्य झालं होतं. 

त्या काकू बिचा-या शांत उभ्या होत्या. पण ही बया! हिच्या ह्या विचित्र प्रकारांमध्ये त्या काकूंना धक्का लागून कधी त्या पडल्या हे कोणाला कळलंही नाही तेव्हा अचानक माझ्या डोक्यात ट्यूब पेटली.. ही मुलगी मला घाबरून एवढा थयथयाट करतीये हो$$य !! वा..! आपल्याला कोणी एवढं घाबरू शकतं!! एवढा वट आहे आपला?!? ह्या कल्पनेने एवढ्या गोंगाटातही गुदगुल्या झाल्या आणि अभिमानाने कॉलर ताठ झाली. अजून काही व्हायच्या आत नशीब ४था मजला आला. दरवाजा उघडला आणि मी सुटलो.  
बाहेर निघताना मला ऐकू आले 'अदिती, चल बाहेर लवकर, कहर केलास ओरडून ओरडून'. तर अदिती नाव होते तिचे. माणसाने किती घाबरट असावं याची काही सीमा की खरंच मी लोकांना एवढा घाबरवू शकतो असा विचार करतच आमच्या नेहमीच्या रस्त्याने मी सरडेंकडे प्रस्थान केले. 

हुश्य!! नको रे बाबा$$ ही माणसं नकोत, यांची लिफ्टही नको. आम्ही बरे आणि आमची सुपरफास्ट लिफ्ट बरी असे म्हणत मी सरडेंकडे पाऊल ठेवत नाही इतक्यात समोर Miss चिचुंद्रे दिसल्या! 'Mr. उंदरे तुम्ही!?'  या त्यांच्या शब्दांनी पुन्हा गुदगुल्या झाल्या आणि एवढ्या धावपळीचं सार्थक झालं असं म्हणत आपोआप माझ्या चेह-यावर स्मितहास्य उमटलं! 




Friday, May 31, 2013

चश्म-ए-बद्दूर पुन:श्च होणे नव्हे!

  नाही, मी चश्म-ए-बद्दूर गाणं नव्हे तर सिनेमा बद्दल बोलतेय! चश्म-ए-बद्दूर नावाचा एक नवीन सिनेमा आलाय एवढंच मी ऐकलं होतं आणि परवा कळलं की हा जुन्या चश्म-ए-बद्दूर चाच  Remake आहे!! बघायची इच्छा तर सोडाच पण मला ही संकल्पनाच नाही आवडली. Remake ह्या संकल्पनेशी काही माझं वाकडं नाही पण चश्म-ए-बद्दूर सारख्या क्लासिक सिनेमाचा Remake?! ये बात कुछ हजम नही हुई. 

                                   चश्म-ए-बद्दूर च्या इतक्या सुंदर आठवणी आहेत. त्या तिघांची ची ती दिव्य रूम, त्यातले एकसे एक पोस्टर्स, सिद्धार्थ चा सीधे पणा, ओमी ची शायरी, रवी ची cute टपोरीगिरी, ते पान टपरी वाले लल्लन मिया, मिस चमको, तिचं लोभस व्यक्तिमत्व, प्लंबर, फिल्म डिरेक्टर scene,  १० रु. चं passing the parcel, tootyfruity icecream वाला वेटर, त्या गोड आजीबाई, खोट्या मारामारीच्या plan मधली खरीखुरी मारामारी आणि मग गोड शेवट हे सगळं मनात इतकं घर करून बसलंय ना की पुन्हा तोच सिनेमा हजारदा पाहू; पण नवा जमाना म्हणून नव्या लोकांना ह्या सगळ्या मस्त कलंदर व्यक्तिरेखांमध्ये बसवून पुन्हा तो  उत्कृष्ठ दर्जा, तो innocence, ती अभिजात विनोदी दृश्य (जमली असली तरी) नाही बुवा आम्हाला पहायची .. का कोण जाणे .. :) 


Monday, May 6, 2013

बिन पिकलेला आंबेवाला

                                 मागच्या रविवारी भर दुपारी चांदण्यात मंडई,  तुळशीबाग इ. ठिकाण ची pending कामं करून परत जात असताना मला एक आंबेवाला दिसला. रस्त्यावरच boxes घेऊन open दुकानच थाटलेलं  जणू. यंदा आंब्यांचे 'असे' stalls खूप दिसताहेत. Stalls कसले, ना त्याला काही छप्पर, ना भिंती. म्हणूनच अश्या ठिकाणाहून आंबे तेही हापूस घ्यावे की नाही हाही प्रश्नच पडतो. तर हा आंबेवाला मात्र कमी पिकलेला, आपलं... कमी वयाचा होता.   ७-८ वर्षांचं पोर. भर दुपारी २ ला आंबे विकत उभं! ना तिथे सावली, ना विसावायला जागा. होतं ते फक्त रणरणतं ऊन. खेळण्याच्या किंवा आईच्या हातचा गरमागरम वरण  भात खाऊन झोपी जाण्याच्या वयात हा अर्धा जीव मात्र घरच्या जबाबदारीमुळे अकाली मोठा होऊन चिटपाखरुही नसलेल्या, ग्राहक मिळण्यास प्रतिकूल अश्या त्या निर्जन रस्त्यावरही  ठाण मारून होता.

ते दृश्य पाहताक्षणी माझी नजर तिथेच हबकली. आपोआप माझी गाडी तिथे येऊन थांबली.  खरं तर  २ एक डझन आंबे घेऊन त्याचे तिथे उभे राहिल्याचे अगदी सार्थक नाही तरी निदान त्याला थोडेसे समाधान मिळवून देणे हेच योग्य दिसत होते. पण २-४ नोटा मिळवून देण्यापेक्षा त्या क्षणी त्याला थंडगार लिंबू सरबत देणे मला जास्त रास्त वाटले.  ५मि. अलीकडे असलेल्या नीरा विक्री केंद्राच्या दादांकडून सरबत आणि थंड पाण्याची बाटली घेऊन त्या छोट्याकडे गेले.
"सरबत आवडते का लिंबाचे?"
"अं ...? नाही, नको"
"आई रागावेल?"
(ओठावर मंद हसू आणि नजर खाली)
"की हे नक्की सरबतच आहे की अजून काही असा विचार करतोएस?"
(मान नकारार्थी हलवून पुन्हा गप्प!)
(मी स्वत: एक घोट पिऊन )"झाले आता समाधान?  घे पाहू बरं आता चटकन!"

थोडसं बिचकतच त्याने ते सरबत घेतलं.
(त्याच्या कडे गार पाण्याची बाटली सुपूर्त करताना)
"बरोबर कोण नाही का तुझ्या आंबे विकायला?"
"पप्पा हायेत.  जेवायला गेलेत."

हसून त्याचा निरोप घेऊन निघाले. जरासे ऊन लागले की Mango juice, उसाचा रस, लिंबू सरबत अन काही नाही तर घरी जाऊन full speed fan नाहीतर AC, इतक्या सहजपणे options ठरवणारं माझं मन मात्र या छोटू साठी एवढं(च) केल्याची खंत आणि  एवढं(तरी) केल्याचं समाधान अश्या मिश्र भावनांमधेच घुटमळत राहिलं.



Monday, January 9, 2012





My predictions on Filmfare award winners '2011:

Best Director: Imtiaz Ali/Zoya Aktar
Best Actor: Ranbir Kapoor
Best Actress: Vidya Balan 
Best actor in a supporting role : Farhan Aktar for ZNMD

Best Editing: Dhobi ghat
Best Special Effects: Ra.One
Best Dialogues: Rockstar

Best playback singer: Mohit Chauhan for Tum ho - Rockstar

RD Burman Award : Ajay-Atul for Singham

Best female debut: Poorna Jagannathan for Delhi Belly





Monday, January 2, 2012

रिक्षा on demand!

पाषाण.. मुख्य पुण्यापासून थोड्या आडभागात असलेला एक शांत, सुंदर परिसर.. पूर्वी नावाप्रमाणेच इथे फक्त पाषाण म्हणजे अर्थात टेकड्या असाव्यात कारण आता वस्ती निर्माण झाल्यानंतरही आजूबाजूला अनेक डोंगर, टेकड्या दिसतात. पाषाणची टेकडी ही त्यांपैकीच एक अशीच प्रसिद्ध टेकडी! एका घराच्या  खिडकीतून दुस-या घरातल्या स्वैपाकघरातल्या भांड्याचे ढीग दृष्टीक्षेपात आणणा-या खिडकीची चौकट बघण्याचे दिवस अजून आले नाहीत इथे, आणि अर्थात.. येऊही नयेत हीच इच्छा.. :) तर अश्या या पाषाण भागात गरजेच्या वस्तूंची दुकानं, सुपर मार्केट्स तर आहेतच पण आजूबाजूच्या औंधसारख्या भागांमध्ये इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या शोरूम्स, विविध restaurants, cafes, malls इ. वैविध्यपूर्ण ठिकाणं असल्यामुळे हा भाग जलद गतीने प्रगत आणि परिपूर्ण होतोय जेणेकरून 'गावात' जायची गरज पडत नाही. गावात म्हणजे पुण्यातला मुख्य बाजारपेठेचा भाग डेक्कन, मंडई इ. भाग अभिप्रेत आहे.


अश्या या प्रदूषणमुक्त, हवेशीर भागात एक अडचण मात्र जाणवते, ती म्हणजे रिक्षांची. पुण्याची एकच काय ती खात्रीची Local transport सेवा! पण सकाळी ८ च्या आधी आणि संध्याकाळी ८ नंतर रिक्षा मिळणे कठीण.. त्यामुळे स्वत:चं वाहन असल्याखेरीज हिंडणे अवघड. तशी पुणेकरांना आपली फटफटी काढली आणि निघाले अशी सवय नक्कीच आहे, पण स्टेशन किंवा बस stand ला बाहेरगावी जायचे असल्यास कोणालातरी सोडायला जावेच लागते. एवढी प्रस्तावना देण्याचं कारण म्हणजे या अडचणीवर तोडगा आज निघाल्यामुळे मला भयंकर आनंद झाला. आजच सकाळी मला प्रगतीने मुंबईला यायचे असल्यामुळे मला ७.१५ वाजता निघायचे होते. आई, बाबा दोघंही नेमके सकाळी मोकळे नव्हते. मग बाबांनी university circle पर्यंत किंवा रिक्षा मिळेपर्यंत सोडायचं असं ठरलं. पण नशीब चांगलं की निघाल्या निघाल्या कॉर्नरलाच रिक्षा मिळाली. ते काका भलतेच बोलके होते.. बोलता बोलता मी सहज विचारलं की फोन करून बोलावलं तर तुम्ही येता का.. म्हणजे रिक्षा service द्यायला..  तर त्यांचं उत्तर होतं - 'हो तर. अहो ताई, पाषाण मध्ये बरेच रिक्षावाले असंच करत्यात. आम्हालाबी कळते न तुमची गैरसोय होते ते. तुमची गरज आणि आमची पण, नाही का.. ह्या ह्या ह्या! घ्या नंबर लिवून घ्या, रिक्षावाले बाळूकाका असं नाव लिवा.. दिवसा हवी असंल तर १ तास आधी फोन करा.. मध्यरात्री किंवा पहाटे हवी असेल तर जरा एक दिवस आधी फोन करा' , म्हटलं वा, हे लई बेस झालं! आणि जेवणाची ऑर्डर एके ठिकाणी पोचती करायला आमच्या मातोश्रींनी त्वरितच या काकांना फोन करून बोलावून घेतलं.. आणि ह्या सेवेचा फायदा करून घेतला. म्हणजे service ची trial पण झाली.. अश्या प्रकारे नवीन वर्षाच्या पहिल्या 'working day' ची सुरुवात अश्या नवीन कल्पनेने झाली. तसं इतरांना 'त्यात काय एवढं' असं वाटण्याची शक्यात आहे पण अश्या या गैरसोयीला थोड्या प्रमाणात का होईना बांध घालता आला किंवा येईल याचाच आम्हा पाषाणकरांना  आनंद! 


- अदिती 

Tuesday, November 1, 2011

मुंबई .. माझ्या नजरेतून (२)

मुंबई मला active वाटते; fast पेक्षा. निदान 'धोबीघाट' सिनेमात दाखवल्या प्रमाणे fast forward command मिळाल्यासारखे लोक माझ्या आसपास नाहीत आणि तसं आयुष्यही वाट्याला नाही. पण मुंबई चा activeness किंवा activeता ;) मला अगदी क्षणोक्षणी दिसते, जाणवते. पहाटे ५ वाजताची वेळ असो किंवा रात्री १२ ची. मुंबईत सामसूम तर बघायला मिळतच नाही; उलट अश्या अपवेळेला सुद्धा मुंबई active असते. आता active active  म्हणजे काय; तर रिक्षावाले, Taxi वाले , सायकलवाले, bike वाले, कार वाले अश्या सगळ्यांची जा ये चालू असते. अंडा भुर्जी, ऑम्लेट पाव, डोसा, बिर्याणीच्या गाड्यांपासून posh hotels, restaurants सगळं अगदी व्यवस्थित सुरु असतं. स्टेशन्स वर तर अक्षरश: गर्दी असते. पायी फिरणारे असतात ते वेगळेच. अर्थात अगदी पहाटे किंवा रात्री उशिरा याचं प्रमाण नक्कीच कमी असतं. पण अगदी सामसूम नसते. ही एक महत्वाची आणि वेगळी गोष्ट मी note  केली. उशिरापर्यंत खास करून मुलींनाही मी भटकताना पाहिलंय! रिस्क तर सगळीकडे आहेच, पण त्या मानाने इथे भीती कमी वाटते.

मुंबईचा 'मार्केट' हा जाम interesting प्रकार आहे.  नाही, मार्केट ला जाणे म्हणजे इतर शहरांमध्ये करतो त्याप्रमाणे अगदी भरपूर प्लान करून, कामांची यादी करून  जायची गरज नाही. मुंबईत मार्केट म्हणजे अक्षरश: गल्लोगल्ली आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती नाही वाटणार. खास करून स्टेशन च्या बाहेर असलेली मार्केट्स म्हणजे पेन च्या re-fill  पासून home theatre पर्यंत च्या सगळ्या दुकानांनी भरलेली असतात. कधी लक्षात येणार नाहीत अश्या काही इंटरेस्टिंग, उपयुक्त, कल्पक वस्तूही अश्या मार्केट्स मध्ये हमखास आणि स्वस्तात मिळतात. दुकानंच नव्हे तर छोटे टपरीवजा stalls नाहीतर अक्षरश: टेबल वर वस्तू मांडून आपलं 'दुकान' थाटणारे लोक हे मुंबईकरांच्या गरजा फार चांगले ओळखून आहेत. पेन, मोजे, बेल्ट्स, रुमाल अश्या रोजच्या लागणा-या आणि वेगळं जाऊन विकत घ्यायला वेळ नसलेल्या वस्तू  स्टेशन च्या बाहेर रोजच्या येण्या जाण्याच्या वाटेवर मिळतात. लोकांना बरं आणि विक्रेत्यांना पण!


मुंबईच्या लोकल ट्रेन्स मधली खरेदी हा या माझ्यासाठी या सगळ्यापेक्षा जास्त कौतुकाचा भाग आहे. लोकल्स मधला बोरीवली-चर्चगेट, CST-कल्याण, चर्चगेट-विरार असा मोठ मोठा प्रवास लक्षात घेता विक्रेत्यांनी तिथेही आपलं विश्व (आणि गि-हाईक) निर्माण केलंय. कानातली, गळ्यातली इ. Ladies Accessories पासून  File होल्डर, कार्ड होल्डर, पेन्स, पुस्तकं, लहान मुलांसाठी चित्र पुस्तिका, रंग, रुमाल, Napkins, चादरी  या आणि अश्या अनेक विविध उपयोगी आणि interesting वस्तू माफक दरात मिळतात. आणि हो, त्याच्या quality बद्दल  जराही शंका बाळगू नका. निदान त्यावर जितके पैसे खर्च करतो त्या मानाने तरी त्या ब-याच टिकतात. स्वानुभवावरून सांगतेय ;). असे हे लोकल मधले mobile मार्केट हे सगळ्यांच्या मनात स्थान करून आहे. निदान ज्यांना अश्या खरेदीची आवड आहे त्यांच्या!


मुंबईकरांच्या सकाळी ६ ते रात्री ११  च्या non-stop, busy दिनचर्येमध्ये सगळ्यांनाच नाश्ता, जेवणाचे डबे बरोबर घेऊन जायला जमत नाही. त्यामुळे ही गरज ओळखून चणे, फुटाणे, दाणे पासून वडापाव, मिसळ, राईस-प्लेट पर्यंत सगळं काही सगळ्या स्टेशनबाहेरच्या  मार्केट्स मध्ये  मिळेल याची काळजी या हॉटेल वाल्यांनी आणि विक्रेत्यांनी घेतली आहे. आणि अशी हॉटेल्स फक्त स्टेशन बाहेर नसून जवळ जवळ प्रत्येक गल्लीत आहेत. त्यामुळे, स्टेशन च्या बाहेर, कोणत्या तरी कंपनी  च्या गेटबाहेर, भाजी मार्केट बाहेर, अगदी भर चौकात कुठेही लोक उभ्या उभ्या खाताना दिसले तरी नवल नाही!

आता विषय निघालाच आहे म्हणून आठवलं, आम्ही चर्चगेट ला काला घोडा फेस्टिवल ला गेलो होतो. तेव्हा शेवटच्या दिवशी रविवारी भटकत भटकत आम्हाला तसा उशीर झाला. रात्री १०.३० च्या आसपास आम्ही चर्चगेट  ला होतो. आणि चर्चगेट म्हणजे खास offices चीच colony. आजूबाजूला सगळी offices च offices. त्यामुळे त्या भागात उशिरा पर्यंत चालणारी हॉटेल्स कमी आहेत आणि आम्हाला तर जाम भूक लागलेली. काय करायचं अश्या विचारात असताना अचानक आम्हाला खमंग ऑम्लेट  चा वास आला. समोर पाहिलं तर एक ऑम्लेट पाव ची गाडी होती! तिघींना एकाच वेळी मोह झाला आणि एकीने त्याच्या 'Quality' ची लगेच हमी दिली की गाडीवरचं असलं तरी हरकत नाही. ब-याचदा ऑफिसला उशीर झाला की अनेक लोकांचा हाच हक्काचा 'dinner' असतो. आम्ही लगेचच ऑम्लेट पाव order केले. चव झक्कासच होती, हे वेगळं सांगायला नको. Flora fountain च्या बाहेर असलेला बेंच म्हणजे आमचा सोफा आणि टेबल म्हणजे  हात, अश्या थाटात आमचं जेवण पार पडलं. मग त्या नंतर समोरच एका juice वाल्याकडून वेगवेगळी ३ juices  घेतली. आता झालं संपूर्ण जेवण! तर सांगण्याचा मुद्दा हा की मुंबईत तुम्ही कुठेही, कधीही असा; तुम्हाला उपाशी राहावं लागणार नाही.

अशी ही मुंबई.. जितकी मोठी, तितकी समजायला सोप्पी, जितक्या चिडवणा-या  गोष्टी इथे,  तितक्याच सुखदायी सुद्धा! कितीही फिरा..संपत नाही, मुंबई Exploration ची उत्सुकता काही कमी होत नाही! :)



- अदिती 




Friday, September 23, 2011

मुंबई .. माझ्या नजरेतून (१)

            लहानपणापासून मी मुंबई बद्दल आई बाबांकडून ऐकत आले आहे. ३ री  पर्यंत डोंबिवलीत राहण्याची संधी मिळाली पण त्यानंतर मुंबईबाहेर पडावे लागले. आणि तसंही डोंबिवली म्हणजे काय खरी मुंबई नव्हे हे आता कळले आहे. :P 
आता पुन्हा मुंबईत यायचा chance मिळाला. मुंबईत यायचे ठरले, तेव्हा मी बंगलोरला होते. तिथल्या मराठी मित्र मंडळातून जे मुंबईचे होते त्यांना मी सहज मुंबईबद्दल 'review' विचारायचे. बहुतांशी लोक मुंबईचं कोडकौतुक करत. नाही म्हटलं तरी मुंबई न आवडणारेही १-२ लोक सापडले. अशा या मुंबईचा गाजावाजा मी जरा जास्तच ऐकत आल्यामुळे तशी मी ह्या शहराबद्दल उत्सुक होते.   
मुंबईत पाऊल ठेवताक्षणी एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हवेतला तीव्र दमटपणा. त्याच क्षणी वाटलं, बोंबला! आपलं इथे कसं होणार देव जाणे. कारण पहिल्यापासूनच माझं आणि घामाचं वाकडं आहे. आणि इथे तर क्षणोक्षणी घामाची अंघोळ घडत असते. त्याची सुद्धा सवय होते असं मुंबईतल्या नातेवाईक आणि मित्र मंडळींकडून  ऐकून ऐकून मी थोडंफार मानसिक समाधान प्राप्त केले होतं. तर मुंबईत हळूहळू मी रुळायला  लागले. लिंकिंग रोड आणि SV Road च्या मध्ये साधारण मी रहायला आहे .. तर आजूबाजूचा भाग explore करायला मी  सुरुवात केली आणि नंतर लोकल भटकंती. सुरुवातीला १-२ दा कोणाबरोबर तरी लोकल ने प्रवास केला. मग एकटीनेच जायला सुरुवात केली. तेव्हा कोणत्या बाजूला कोणती ट्रेन येते, digital board कसा वाचायचा, आपण नक्की योग्य ट्रेन मध्ये शिरलोय ना, नाहीतर चर्चगेट ला जायचेय आणि पकडली बोरीवली ट्रेन असली भानगड व्हायला नको. पण मुंबईने सगळं खूप पटापट शिकवलं. मुंबईत कोणीही कोणाला बिनधास्त शंका विचारतात; अर्थात मुंबईप्रवासाविषयी. कोणाला  उगाच लाज किंवा संकोच वाटत नाही. उदा. ही fast लोकल आहे ना, ही बेलापूर लोकल ठाण्याला थांबते ना,  पुढची विरार लोकल कधी आहे.. आज ट्रेन्स लेट आहेत का, ही ट्रेन बांद्रा आहे की बोरीवली (कारण बांद्रा चा shortform B आहे आणि बोरिवलीचा Bo. तर confusion झाल्यास) इ.   आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक मनमोकळेपणाने सांगतात सुद्धा. 'मला नाही माहीत' किंवा 'वाचता येत नाही का' असल्या खवचट टिपण्या करत नाहीत.  
मुंबई खूप मोठी असली तर एक मात्र आहे, मुंबई ची रचना कळणं अवघड नाहीये तसं. शेवटी एका बेटावर वसली आहे ही मुंबई. आकार वाढू शकतच नाही. वाढताहेत ती फक्त लोकं. :) मुंबई ही चर्चगेट  ते विरार अशी खालून वर पसरली आहे. एकानंतर एक सरळ रेषेत सगळी  स्टेशन्स अहं sorry suburbs पसरली आहेत. दादर, बांद्रा, गोरेगाव, बोरीवली यांना मी आपली स्टेशन्स म्हणायचे साध्या भाषेत. पण नाही हो, मुंबईकर त्यांना suburbs म्हणतात :) अशी ही सगळी suburbs  मिळून मुंबई तयार होते. प्रत्येक suburb चं स्वत:चं असं वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरणार्थ, पार्ले म्हणजे  खास मराठी (आणि गुज्जू) लोकांची वस्ती. बरेचसे साहित्यिक, कलाकार पार्ल्याचे! मुंबईतलं पुणं असंही म्हणतात पार्ल्याला. इथेच  आपल्या आवडीच्या प्रसिद्ध पार्ले बिस्किटांची factory आहे; म्हणूनच नाव विलेपार्ले. दादर - सर्व दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण. south bombay ला स्वत:ची  अशी एक वेगळीच ओळख आहे. असं प्रत्येक भागाला आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्व आहे. मुंबईची गर्दी, अस्वच्छता हे कुप्रसिद्ध मुद्दे असले तरी मुंबईत काही भाग खरंच उत्कृष्ट, स्वच्छ, posh आणि मुख्य म्हणजे शांत आहेत.  मस्त वाटतं भटकायला. 

   एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ ही उक्ती मुंबईकर अगदी सार्थ ठरवतात. आता इथे मुंबईकर म्हणजे फक्त मुंबईचे असलेलेच नव्हे तर मुंबईत तूर्तास राहणारे सगळे अपेक्षित आहेत. म्हणजे मग त्यात सगळ्या प्रांतातले, कायमस्वरूपी इथे असणारे, तात्पुरते आलेले सगळे सगळे आले. आणि त्यात चक्क रिक्षावाले ही जमात पण आली. पुणे, बंगलोर इथले रिक्षावाले पाहिल्यावर मुंबईचे रिक्षावाले बरेच बरे आहेत. रात्री अपरात्री ही कुठेही येण्यास फारशी कुरकुर न करणे, कितीही जवळच्या भागात यायला चटकन तयार होणे, उरलेले सुट्टे पैसे passenger मागण्याची वाट न  बघता चोख परत करणे या कामगि-यांमध्येच त्यांचं यश आहे. आता माझा हा परिच्छेद वाचून कोणीतरी 'असला काही अनुभव मला आला नाही' वगैरे म्हणण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण आंब्यांच्या आख्ख्या पेटीत एखादा आंबा सडका निघणारच. त्याला पर्याय नाही. 

तर अश्या या शहरात पक्के मुंबईकर आणि बाहेरचे लोक मुंबईच्या गर्दी, उकाडा अशा रोजच्या समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ठाण मारून का आहेत, याचं गमक मला हळूहळू का होईना कळायला लागलंय. हो, मुंबईत गर्दी आणि उकाडा या २ मुद्द्यांना समस्याच म्हणावं लागेल. आणि जो पर्यंत तुम्ही या २ मुद्द्यांना निव्वळ सतत घडणा-या साध्या घटना किंवा Part of routine न समजता 'समस्या' समजता तो पर्यंत तुम्ही पक्के मुंबईकर नव्हे हेही तितकंच खरंय!  ;)    


- अदिती 


Followers