Friday, March 6, 2009

आणि एकदाची ही सकाळ संपली !

रोज ऑफ़ीस मधे आल्यावर संध्याकाळची वाट बघणे किव्वा दिवस कधी संपेल असं वाटणे साहजिक आहे, पण सकाळी सकाळी ही सकाळच संपावी असं जर कधी वाटलं तर नक्कीच ती सकाळ मन:स्ताप देणारी असली पाहिजे, नाही का ? फार कोड्यात बोलत नाही. आजची सकाळ कशी विशेष ठरली हे सांगण्यासाठी वरची प्रस्तावना !

काल रात्रीच स्वैपाक करताना एक आपत्ती आली ती म्हणजे गॅस संपला. वरण भात झाला होता, पण पोळ्या आणि चवळीची उसळ करायची राहिली होती. माझ्याकडे ५ कि. चा छोटा गॅस असल्यामूळे स्वत: जाऊन refill करण्या शिवाय़ पर्याय नव्हता. home delivery पद्धत उपलब्ध नाही. सकाळी उठल्या उठल्या दात घासण्यासाठी नळ उघडल्यावर अजुन एक शुभवार्ता कळली, ती म्हणजे नळाला पाणी नाही. नळाला पाणी नसणं ही काही जगावेगळी घटना नाही म्हणुन येईल थोड्या वेळात असं म्हणुन माझ्या regular morning walk (कालच सुरु केला, ही गोष्ट वेगळी !) ला खंड पाडून मी गॅस refill च्या मॊहिमेवर निघाले. (of course दात घासुन, पाण्याचा back up असतो नेहमी घरात). तंगड्या तोडत गॅस च्या दुकानात गेले आणि भरलेला जड गॅस घेउन हाश्य हुश्य करत घरी पोचले. मोटर चा आवाज येत होता. चला, म्हणजे पाणी वर चढतंय!! सुटकेच नि:श्वास टाकला. तळमजल्यावर घराचे owner राह्तात. त्या आंटींना सुद्धा विचारुन खात्री करुन घेतली. घरी गेले आणि समजलं पाण्याचा अजुनही पत्ताच नाहीये. माझ्याकडे एकच तास शिल्लक होता कारण त्या नंतर मला ऑफ़ीस होते. स्वैपाक, भांडी, कपडे, आंघोळ सगळ्याचीच बोंब होती. परत खाली गेले आंटींकडे , त्या म्हणाल्या, टाकीत पाणी, पडतंय थोडं अजुन पडलं की मोटर चालू करते. मला ok म्हणण्या शिवाय पर्याय नव्हताच ! पुन्हा झक मारत वरती गेले घरी. आणि काय नशीब ! विद्युत मंड्ळाने माझ्या वर क्रुपा केली होती. नाही, उद्दिष्ट चांगलं होतं त्यांचं, विजेची बचत, पण त्या क्षणी ती बचत मला खुप महागात पडत होती. आता लाईटच नाही म्हटल्यावर मोटर काय डोंबल सुरू करणार ! झालं ! पुढचा अर्धा तास माझ्या डोळ्या समोर उभा राहीला. थोडी भांडी पड्लेली, लॉंड्री बॅग मधे कपडे आणि माझी आंघोळ, सगळाच आनंदी आनंद ! पाण्याचा back up बादलीत ठेवला होता. पण गरम पाणी गिझर मधुन मिळतं आणि त्या साठी लाईट असावे लागतात. हे सगळं माझ्या नशीबात त्या क्षणी तरी नव्हतं, म्हणून धबधब्याच्या गार पाण्यात आपण मस्तं भिजत आहोत अशी कल्पना करत गार पाण्याने आंघोळ पार पाडली. लाईट आणि पाणी दोन्ही नसल्यामुळे स्वैपाक करायचा प्रश्नच नव्हता. म्हणुन परत आंटींकडे गेले. त्या आणि मी दोघीही रिकाम टेकड्या, निदान काही वेळ, म्हणुन बसलो दोघी चहा पीत. आंटींच्या हातचा चहा म्हणजे अगदी अमृत, त्यामुळे दुष्काळात पाण्याचा थेंब मिळावा तसं झालं. आणि त्यात आंटींनी गरम गरम छोले माझ्या पुढ्यात ठेवले. म्हणाल्या, आता कुठे काही करत बसते, हेच घेउन जा डब्यात ! चला ! आंटींचे आभार मानून मी घरी परतले. भाताचा कुकर लावला , म्हटलं, आज पंजाब्यांसारखा छोले राईस खावा ! आता मी काल पासुन भिजवलेल्या चवळीचं काय करायचं हा प्रश्न होता. भरीत भर म्हणजे, माझ्याकडे फ़्रीज नाही, सो मला चवळीचं काहीतरी मार्गी लावणं must होतं. त्या उरलेल्या १० मि. मधे पटाकन चवळीची उसळ करून टाकली. संध्याकाळची सोय झाली. आता आज दोन्ही वेळेला कडधान्यं. चायला, कधीच मी कडधान्यं भिजवत नाही, भिजवली ती अश्या ऐतिहासिक दिवशी ! तर अश्या रितीने ही सकाळ एकदाची संपली !
- अदिती

1 comment:

Followers